लसपुरवठ्यात वाढ न केल्यास पश्चिम बंगालमधील स्थिती गंभीर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लसपुरवठ्यात वाढ न केल्यास पश्चिम बंगालमधील स्थिती गंभीर

बंगाल : पश्चिम बंगालच्या लसपुरवठ्यात वाढ न केल्यास राज्यातील करोनाची स्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त करत लस वाटपात होणाऱ्या तफावतीसंदर्भात आवाज उठवला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुरुवारी पत्र लिहून लसपुरवठा वाढविण्याची मागणी केली.

राज्याची लोकसंख्या अधिक असूनही त्या तुलनेत होणारा लसपुरवठा कमी असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व पात्र नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्याला १४ कोटी मात्रांची आवश्यकता आहे. दररोज ११ लाख मात्रा देण्याची क्षमता असूनही केवळ लसपुरवढा कमी होत असल्याने सध्या राज्यात दिवसाला चार लाख मात्रा देण्यात येत आहेत.  राज्याची लोकसंख्या अधिक असून आणि शहरीकरणाचा दरही जास्त असताना राज्याला अतिशय कमी प्रमाणात लसपुरवठा होतो, असे पत्रात बॅनर्जी यांनी नमूद केले आहे. तसेच याआधीही वारंवार यासंदर्भात पत्रव्यवहार केला असूनही पंतप्रधानांनी त्याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप ममतांनी केला.

केंद्र सरकारकडून काही राज्यांना मोठ्या प्रमाणात लस वाटप होते, हे सांगण्यात मला खेद वाटतो. एखाद्या राज्याला अधिक लसपुरवठा होत असेल तर माझी काहीच हरकत नाही. मात्र पश्चिम बंगालला लसपुरवठ्याबाबत दुर्लक्षित केले जात असल्यास मी शांतपणे पाहू शकत नसल्याचे ममता म्हणाल्या. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत एकूण ३.०९ कोटी जणांचे लसीकरण झाले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.