भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी

भाजपने आपली ८० जणांची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहिर केली. त्यातून वगळण्यात  आलेली प्रमुख नावे म्हणजे अर्थातच माजी केंद्रिय मंत्रि मेनका गांधी आणि त्यांचा पुत्र वरूण गांधी. याच वरूण गांधी यांनी लखीमपूर खिरी येथील चार शेतकरी भाजप नेत्याच्या पुत्राने केलेल्या कथित गोळीबारात ठार झाल्यावर आपल्याच पक्षाला खडे बोल सुनावले होते. लखीमपूर खिरी घटनेचा त्यांनी कडक शब्दांत निषेध केला होता. पण पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे पक्षावर आणि त्यांच्या स्वतःवर टिका सहन करणार्यांपैकी नाहित. पक्षात राहून आपल्याच पक्षावर टिका करण्याची संस्कृती काँग्रेसची आहे. भाजपची नाहि. त्यामुळे वरूण आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या आईलाही भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तसेही हे मातापुत्र कर्तृत्वाने सोनियापुत्रांइतकेच निष्प्रभ आहेत. त्याबाबतीत दोन्ही गांधी चुलतबंधु सारखेच आहेत. राहुल आणि प्रियंका गांधी यांना निवडणुका जिंकून देता येत नाहित. तरीही ते पक्षात सर्वात शक्तिशाली आहेत. तर वरूण आणि मेनका गांधी हे इतके दिवस पक्षात राष्ट्रीय कार्यकारिणीत का होते, हे  त्यांचे त्यांनाही सांगता येत  नसेल. आता त्यांच्यासाठी सारा प्रश्नच संपला आहे. वास्तविक, वरूण गांधी यांचे वडिल हे चांगलेच कर्तृत्ववान होते. त्यांच्या वाईट संगतीने ते बदनाम झाले, ही खरी गोष्ट आहे. पण त्यांचा लोकसंख्या नियंत्रणाची योजना अमलात आली असती तर आज जे लोकसंख्या स्फोटाचा प्रश्न देशाला सतावत आहे, त्यातून देशाची सुटका झाली असती. असो. पण वरूण गांधी यांच्यात वडलांच्या एक दशांश इतकेही कर्तृत्व नाहि. राहुल असो की वरूण, आश्चर्य वाटते ते याचे की आजी इतकी अफाट कर्तृत्वसंपन्न, पणजोबा तर देशाचे पहिले पंतप्रधान, असे असतानाही या पुढच्या पिढीने थोडाही कर्तृत्वाचा वारसा का घेऊ नये. कर्तृत्वाचा वारसा हा घराण्यावर अवलंबून नसतो तर तो प्रत्येकाच्या व्यक्तिगत गुणांमुळेच तयार होतो, इतकाच निष्कर्ष काढता य़ेईल. एरवी वरूण गांधी यांनी लखीमपूर खिरी घटनेवर भाजपलाच लक्ष्य करणारे वक्तव्य केले असते, तर त्याकडे इतके गांभिर्याने पाहिले गेलेही नसते.  पण आता सर्वात महत्वाची अशी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक होत असताना आणि त्यात भाजपचे सारे काही पणाला लागले असताना वरूण गांधी यांच्यासारखे आत्मघातकी वक्तव्ये करणारे नेते पक्षाला परवडणारे नाहित. लखीमपूर खिरी घटना ही उप्र निवडणुकीत अत्यंत महत्वाचा मुद्दा बनणार आहे, याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. अशा वेळेस, पक्षातीलच नेता पक्षावर टिका करत असेल तर कोणत्याही पक्षाला ते परवडणार नाहि. हाच संदेश मोदी शहांनी दिला आहे. पक्ष म्हणून त्यांचा निर्णय योग्य असला तरीही माणुसकीच्या दृष्टिने मात्र एकदम चुकीचा आहे. सत्यकथन केले म्हणून एखाद्याला बाहेरचा रस्ता दाखवणे हे चुकीचेच आहे. पण हेच प्रकार काँग्रेसनेही केले आहेत. अनेकदा इंदिरा गांधी यांच्यावर उघ़ड टिका केली म्हणून अशा नेत्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. उप्र निवडणुकीत भाजपचे अस्तित्व पणाला लागले नसले तरीही भरपूर मताधिक्य मिळवून जागा जिंकणे हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिने आवश्यक आहे, हे पक्षाला कळते. म्हणूनच वरूण गांधी यांचे वक्तव्य इतके गांभीर्याने जे पी नड्डा यांनी घेतले आहे. भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून ८ जणांची निवड केली आहे. त्यात माजी मुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. ही त्यांच्या कार्याची पावतीच आहे. कारण फडणवीस यांना ज्या ज्या राज्याची जबाबदारी दिली आहे, ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. बेळगाव निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला धोबीपछाड देत भाजपला एकहाती यश मिळवून दिले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये अमित शहांची अतिरेकी वक्तव्ये सोडली तर फडणवीस यांच्यामुळे भाजपने ३ जागांवरून ७७ जागांवर झेप घेतली, हे दुर्दम्य य़शच आहे. अशा फडणवीस यांच्या कर्तृत्वाचा केंद्र पातळीवर गौरव झाला आहे. दुसरी निवड म्हणजे चित्राताई वाघ यांची आहे. त्यांनी किरीट सोमय्यांच्या बरोबरीने शिवसेना आणि राष्ट्रवादीशी पंगा घेतला आणि त्या दोन पक्षांना जर्जर करून सोडले आहे. चित्राताईंमुळे तर शिवसेनेचे मंत्रि संजय राठोड यांना राजिनामा द्यावा लागला. त्यांच्या या कर्तृत्वाची केंद्रिय पातळीवर दखल घेतली गेली. अर्थातच फडणवीस यांनी  त्यांची शिफारस केली होती. पण चित्राताईंच्या कर्तृत्वाला आणखी झळाळी येईल, ही अपेक्षा भाजपला असेल. महाविकास आघाडी सरकारला सोमय्या आणि चित्राताई या दोघांनीच खरेतर जेरीस आणले.  त्यांच्यामुळे कित्येक प्रकरणे उघड झाली आणि आता मविआचे नेते ईडीच्या भीतीमुळे फरार आहेत किंवा रूग्णालयात दाखल आहेत. बाकी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जी नावे आहेत, तिच्यात फारसा बदल झालेला नाहि. पंतप्रधानांच्या धोरणांवर टिका करणारे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे घनिष्ट मित्र  सुब्रमण्यम स्वामी यांनाही कार्यकारिणीतून काढण्यात आले आहे. त्याऐवजी ज्योतिरादित्य शिंदे  या पूर्वाश्रमीच्या काँग्रेस नेत्याला स्थान दिले आहे. भाजपची ही नवी कार्यकारिणी कितपत जोमाने काम करते आणि २०२४ च्या निवडणुकीत भाजपला पुन्हा विजय मिळवून देते का,  याची प्रतिक्षा करावी लागेल.