कोरोना बळींच्या कुटुंबीयांसाठी 20 हजार कोटी रुपयांचे भरपाई पॅकेज केंद्राकडून झाले निश्चित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोना बळींच्या कुटुंबीयांसाठी 20 हजार कोटी रुपयांचे भरपाई पॅकेज केंद्राकडून झाले निश्चित

नवी दिल्ली : कोरोनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे २० हजार कोटी रुपयांचा निधी निश्चित केला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानेΣ (एनडीएमए) गृह मंत्रालयाला एक अहवाल सादर केला असून त्यात येत्या पाच वर्षांसाठी त्यांच्याकडे किती फंड राहील हे सांगितले आहे. यासोबत भरपाई रक्कम निश्चित करण्याशी संबंधित कागदपत्रेही सोपवली आहेत. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांसाठी केंद्र सरकारला भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. रक्कम किती असेल, कशी दिली जाईल, याची माहिती देण्यासाठी कोर्टाने सहा आठवड्यांचा अवधी दिला होता. या आदेशानंतर केंद्राने भरपाईचे पॅकेज तयार केले आहे.

देशात कोरोनामुळे ४.३० लाख मृत्यू झाले आहेत. सरकारने ५ लाख मृत्यूच्या हिशेबाने निधीची तरतूद केली आहे. भरपाई निश्चित करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, प्रत्येक मृत्यूमागे कमीत कमी ४ लाख रु. दिले जाऊ शकतात. २०१४ मध्ये आपत्तीतील भरपाईची रक्कम निश्चित झाली आहे.

ज्यांनी ५ लाखांवर विमा घेतला होता, त्यांना भरपाई मिळण्याची शक्यता नाही

एनडीएमएने आपल्या अहवालात गृह मंत्रालयाला सांगितले की, भरपाईची रक्कम एकसमान असली पाहिजे. यासोबत हेही सांगितले की, ज्या लोकांनी ५ लाख रु. किंवा त्यापेक्षा जास्तीचा आयुर्विमा काढला होता, त्यांना भरपाई मिळतच आहे. त्यामुळे त्यांना नव्या भरपाईच्या कक्षेबाहेर ठेवले जाऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी भरपाईबाबतची घोषणा १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर करू शकतात.