आनंदधाम भक्तनिवासमध्ये गरजूंना 10 रूपयात पोटभर भोजन पार्सल सेवा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आनंदधाम भक्तनिवासमध्ये गरजूंना 10 रूपयात पोटभर भोजन पार्सल सेवा

अहमदनगर, :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नगरमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.त्यामुळे रोजगार ठप्प झाला असला तरी पोटाची भूक भागवली जाणे अत्यावश्यक आहे.त्यातच सध्या नगर शहरात अनेक परगावचे रूग्ण विविध हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांसमोरही पोट भरायचा प्रश्न होतो.अशा सर्वांसाठीच सध्या आनंदधाम फौंडेशनची अन्नसेवा अतिशय मोलाची ठरत आहे.दररोज 500 ते 600 गरजू याठिकाणी येवून सकस,पौष्टिक भोजन पार्सल घेवून जात आहेत.या सेवेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याच्या दृष्टीने फौंडेशन प्रयत्न करीत आहे.
               या अन्नसेवा केंद्राला पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी नुकतीच भेट दिली.ते म्हणाले की,मागील लॉकडाऊनपासून अखंडपणे आनंदधाम फौंडेशन अन्नसेवा देत आहेत.गोरगरीब,गरजू,प्रवास करणारे अशा अनेकां ना अतिशय अल्प दरात चांगले पोटभर जेवण मिळण्यासारखा आनंद नाही.नावा प्रमाणेच हे फौंडेशन लोकांना आनंद देण्याचे काम करीत आहे.अशा एकत्रित प्रयत्नातूनच करोना महामारीला आपण सगळे जण यशस्वीरित्या तोंड देवू शकतो.आनंदधाम फौंडेशनने आचार्य आनंदऋषी महाराज यांच्या पुण्यस्मृतीला वर्षभरापूर्वी अन्नदानाचा नंदादीप प्रज्वलित केला.तो वर्षभरापासून अखंडपणे चालू आहे.आनंदधाम भक्तनिवाससमोर नाममात्र 10रुपये शुल्क आकारुन रोज सकाळी 11 ते 2 यावेळेत आपुलकी आणि सेवाभाव असलेले जेवण सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. दररोज दोन वाटी भाजी,तीन चपाती,ठेचा,चटणी तसेच पुलाव,दालखिचडा असे सकस जेवण याठिकाणी दिले जाते.सेवा भाव जपताना जेवण अतिशय हायजेनिक वातावरणात आणि चांगल्या मटेरियलपासून तयार होईल याची विशेष दक्षता घेतली जाते.