पंजाब काँग्रेसमधील गुंता कायम

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंजाब काँग्रेसमधील गुंता कायम

पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करून काँग्रेस श्रेष्ठींनी कदाचित सुटकेचा निःश्वास सोडला असेल. पण त्यांची ही सुटकेची भावना किती क्षणभंगुर आहे, हे त्यांना दुसर्या दिवशीच कळले असेल. नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमून पक्षश्रेष्ठींनी तोडगा काढण्याचे खोटे समाधान मिळवले आहे. कारण सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्याच्या दुसर्या दिवशी अमृतसर येथे सुवर्णमंदिराला भेट देताना भरपूर शक्तिप्रदर्शन केले. सिद्धू आणि पंजाबचे मुख्यमंत्रि अमरिंदर सिंग यांच्यात आडवा विस्तव जात नाहि. किंबहुना सिद्धू यांनी अमरिंदर याच्याविरोधात जितकी कडक भाषा वापरली तितकी कडक भाषा कधी अकाली दल या कडव्या विरोधी पक्षाविरोधातही वापरलेली नाहि. अमरिंदर यांच्याविरोधात सातत्याने आरोप करत सिद्धू यांनी स्वतःचे उपद्रवमूल्य तयार केले आहे. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींना सिद्धू यांना शांत करण्यासाठी पंजाब काँग्रेसचे प्रमुख कराव लागले. पण यामुळे दोघांमधील वैर वाढतच जाणार आहे, याची चिन्हे दिसू लागली आहेत. वास्तविक पंजाब काँग्रेसचे प्रमुख पद स्विकारल्यावर सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला हवी. तसा शिष्टाचार आहे. परंतु सिद्धू थेट अमृतसरला गेले परंतु अमरिंदर याना भेटायला गेले नाहित. अमरिंदर यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात सिद्धू यांची भेट घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाहि, असे सांगण्यात आले आहे. अमरिंदर यांनी अवघड काळात काँग्रेसची नाव सत्तेच्या तीराला लावली आहे, हे खरेतर कुणी विसरायला नको. संपूर्ण देशात काँग्रेसची मानहानी होत असताना अमरिंदर यांनीच पक्षाची अब्रु वाचवली आहे. परंतु काँग्रेस श्रेष्ठींनी सिद्धू यांच्या नादात अमरिंदर यांच्यावर अन्यायच केला आहे. सिद्धू यांच्या मागे किती आमदार आहेत, याचे अद्याप प्रत्यंतर आलेले नाहि. परंतु सिद्धू यांच्यापेक्षा पक्षात अमरिंदर यांचे वजन नक्कीच जास्त आहे, हे तर स्पष्टच आहे. पंजाब काँग्रेसमधील नेतृत्वाचा वाद इतक्या लवकर सुटणारा नाहि, याची मात्र खात्री काँग्रेस हायकमांडला पटली असावी. काँग्रेसची मजबुरी ही आहे की ज्या सिद्धू यांनी राहुल गांधी यांना पप्पू असे अपमानास्पद विशेषण दिले त्याच सिद्धू यांना पंजाब काँग्रेसची धुरा सोपवावी लागली. पंजाबात सातत्याने अकाली दल आणि काँग्रेस आलटून पालटून १९६६ पासून निवडून येत आहेत. त्यामुळे मतदारही कंटाळले आहेत आणि त्यांनी आम आदपी पक्षाला एक पर्याय म्हणून पाहिले. म्हणूनच सध्या पंजाब विधानसभेत आप पक्ष हा मुख्य विरोधी पक्ष आहे. काँग्रेस आणि अकाली दल हे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून पाहिले जाते. त्यामुळे सिद्धू हे काँग्रेसने दिलेले नवीन चेहरा आहेत. कारण चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकूनही त्यांना आजही पंजाबच्या बाहेरचे म्हणूनच पाहिले जाते. पंजाब सिद्धू याना कधीच राज्याचा म्हणून मानत नाहि. त्याचा फायदाही सिद्धू यांना झाला आहे. त्यामुळे काँग्रेसने केलेले हे नवीन धाडसच आहे. पण सहा महिने हा दिर्घकाळ आहे. या सहा महिन्यात सिद्धू आणि अमरिंदर गटात पॅच अप तर सोडाच, पण बोलण्यांच्या पातळीवरचे तरी संबंध प्रस्थापित होतात का, याचीही शंका आहे. दोन गटातील वाद हा भाजपच्या दृष्टिने पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी एक शस्त्र आहे. भाजप त्याचा कितपत फायदा उठवतो, यावर त्या पक्षाचे यश अवलंबून आहे. एक काँग्रेस सोडली तर पंजाबमधील सारे नेते आणि घटक कधी नं कधी भाजपबरोबर राहिलेले आहेत, सिद्धू हे तर भाजपमधूनच आलेले आहेत. अकालींशी भाजपची अनेक वर्षे युती होती. त्यामुळे भाजपला सार्यांना कसे हाताळायचे हे चांगले माहित आहे. त्याला टक्कर देण्याइतकी ताकद सध्या फक्त अमरिंदर आणि सिद्धू यांच्याकडेच आहे. सिद्धू यांना काँग्रेसने अध्यक्षपद देऊन एक प्रकारे अमरिंदर यांना चिडवले आहे. प्रदेशाध्यक्ष हा खरेतर भावी मुख्यमंत्री असतो. त्यामुळे आता सिद्धू हे अमरिंदर यांच्या थेट युद्धरेषेवर आले आहेत. पण अमरिंदर हे अत्यंत लढाऊ आणि चिवट नेते आहेत, हेही विसरता कामा नये. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला आहे. अमरिंदर जेव्हा मागील विधानसभा निवडणूक एकहाती लढवत होते, तेव्हा राहुल गांधी यांनी पंजाबला भेट देण्याचेही टाळले होते. तरीही अमरिंदर यांनी स्वबळावर पंजाबात काँग्रेसची सत्ता आणली आहे. त्यामुळे सिद्धू यांचे लाड करताना काँग्रेसला अमरिंदर यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहि. काँग्रेसने शांतता करार घडवून तर आणला आहे. पण तो कितपत टिकेल, हे कुणीच सांगू शकणार नाहि.