जावेद अख्तर यांच्या वक्तव्यामुळे भाजप संतप्त

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जावेद अख्तर यांच्या वक्तव्यामुळे भाजप संतप्त

मुंबई ,: लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी हिंदुत्त्ववादी संघटनांची तुलना तालिबानशी केल्यामुळे भाजप संतापली आहे. जावेद अख्तर यांच्या विधानाची निंदा करत भाजपने त्यांना एक महिना अफगाणिस्तानात घालवण्याचा सल्ला दिलाय.
एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेची तुलना तालिबानशी केली. जावेद यांनी विहिंप, बजरंगदल आणि संघासारख्या संघटना तालिबानसारख्या आहे. तसेच संघाचे समर्थक हे तालिबानी मनोवृत्तीचे समर्थक असल्याचा आरोप जावेद यांनी केलाय. तसेच हिंदुत्ववादी संघटनांना त्यांनी आत्मपरिक्षण करण्याची सूचना केलीय. त्यांच्या या आक्षेपार्ह विधानावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी अख्तर यांना कायदेशी कारवाईसाठी तयार राहण्याचा इशारा दिलाय. तर पक्षाच्या इतर ज्य़ेष्ठ नेत्यांनी अख्तर यांच्या विधानाची तीव्र निंदा करत निषेध व्यक्त केलाय.

राष्ट्रवादी विचारांची अवहेला - दरेकर
महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले की, जावेद अख्तर यांनी संघाची कार्यशैली न समजता बेजबाबदार वक्तव्य केले आहे. मी या विधानाचा तीव्र निषेध करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य राष्ट्रवादावर आधारित आहे, परिणामी अख्तर यांचे विधान संघविरोधी नसून राष्ट्रवादी विचारांच्या विरोधात मानले पाहिजे असे दरेकर यांनी सांगितले.
अख्तर हिंदूंना समजू शकले नाहीत - पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, जावेद अख्तर यांना हिंदू शब्दाचा अर्थ समजला नाही. हिंदू धर्म ही पूजापद्धती नाही तर हिंदू जीवन तत्त्वज्ञानाचा इतिहास 5 हजार वर्षे जुना आहे. हिंदूंनी अन्य धर्माच्या लोकांचे भारतात स्वागत आणि सहकार्य केलेय. त्यामुळे 'सर्व धर्म समभाव' हा शब्द हिंदू शब्दाचा पर्यायवादी शब्द आहे. यावेळी त्यांनी अख्तर की, अत्तर कोण ते ओळखत नसल्याचा टोला देखील लगावला.
महिनाभर तालिबानसोबत रहावे- बावनकुळे महाराष्ट्राचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कवी म्हणून देशातील लोकांना जावेद अख्तर यांच्याबद्दल आदर होता. पण, त्यांचे बेजबाबदार विधान निंदनीय आहे. बावनकुळे यांनी सल्ला दिला की, जावेद अख्तर यांनी एका महिन्यासाठी अफगाणिस्तानला जाऊन तालिबान्यांसोबत वेळ घालवावा, त्यानंतर त्यांनी संघ आणि हिंदूंविषयी चर्चा करावी असे बावनकुळे यांनी सांगितले.