स्वबळाच्या गोंधळातून बाहेर पडा; संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

स्वबळाच्या गोंधळातून बाहेर पडा; संजय राऊतांचा काँग्रेसला सल्ला

मुंबई युतीत असो वा आघाडीत असो शिवसेना कायम प्रत्येक लढाई स्वबळावर लढत आली आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची दिशा आणि भूमिका स्पष्ट केली आहे, असं सांगतानाच काही पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. त्यांच्यात एकवाक्यता नाही. त्यांनी या स्वबळाच्या गोंधळातून आधी बाहेर यावं, असा सल्ला वजा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला लगावला आहे. (Those who want to contest alone, let them do it: Sanjay Raut)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. शिवसेना कायम प्रत्येक लढाई स्वबळावर लढत असते. युतीत असो महाआघाडीत असो, तो राजकीय विषय असतोनिवडणुका हा राजकीय विषय असतो. पण प्रत्येक लढाई आम्ही कायम आमच्या ताकदीवर लढत आलो आहोत. काल मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची पुढची दिशा आणि भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्यामुळे कुणाच्याही मनात भ्रम राहता कामा नये. महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्या पक्षात एक नेता स्वबळाची भाषा करतो. दुसरा म्हणतो ही पक्षाची भूमिका नाही. त्यामुळे त्या सर्वांनी या गोंधळातून बाहेर आलं पाहिजे. मग स्वबळ वगैरे काय आहे त्या संदर्भात निर्णय घेऊ, असं राऊत म्हणाले.

आम्ही असंच बसणार का?

शिवसेनेबद्दल म्हणाल तर उद्धव ठाकरे यांनी काल दिशा दिली. त्यानुसार शिवसेना कोणत्याही लढाईला कायम तयार आहे. बळावर, स्वबळावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर. ज्यांना स्वबळावर लढायचं लढू द्या. आम्ही काय करणार? असंच बसणार का? शिवसेना प्रत्येक लढाई स्वबळावर लढायचं जाणते, असंही ते म्हणाले.

ते पोटात घ्यायचं औषध आहे

सत्ता नसल्याने काही लोकांना पोटदुखी सुरू झाली. हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यावर त्यांनी काल पोटात घ्यायचं औषध दिलं आहे. उगळून लावायचं नाही. त्यामुळे हळूहळू आजार बरा होईल, असा चिमटा त्यांनी काढला.

कोकणातील दशावतार कायम

कोकण आहे शिवसेना आहे त्यामुळे काही गोष्टी घडल्या असतील कोकणात. त्यामुळे मुंबईत त्याची चर्चा करण्याची गरज नाही. कोकणातील गोष्टी कोकणात. कोकणातील दशावतार कायम आहेत. या संदर्बात तिसरा अंक करायचा ते बघू. पण त्याविषयी मला माहित नाही. स्थानिक आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांच्या लेव्हलच्या त्या गोष्टी असतात, असं त्यांनी सांगितलं. दादर आणि कोकणात जे घडलं त्याचा संस्कृतीशी संबंध नाही. तसा संबंध जोडू नका. अंगावर आलं तर शिंगावर घेऊ ही संस्कृती आहे. शांतता नांदायची असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे. विरोधासाठी विरोध, राजकारणासाठी राजकारण करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.