'यास'चा परिणाम महाराष्ट्रातही, आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
मुंबई, २७ : 'यास' चक्रीवादळाचा तडाखा ओडिशा आणि पश्चिम बंगालला बसला. त्यानंतर आता या चक्रीवादळाला फटका महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रासह चार राज्यांचा समावेश
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यास चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालची सीमा ओलांडून बिहारच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. त्याचा प्रभाव महाराष्ट्रासह झारखंड, बिहार, छत्तीसगडच्या काही भागांत पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
'या' जिल्ह्यांमध्ये बरसणार पाऊस
महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान नागपूर वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो. छत्तीसगडलगतच्या गोंदिया, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये 'यास'चा सौम्य प्रभाव पडू शकतो. या भागात ताशी १५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज आहे.