विश्वचषकाच्या निर्णयासाठी ‘बीसीसीआय’ला दिलासा
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली : करोना साथीच्या पार्श्वभूमीवर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) अपेक्षेप्रमाणे २८ जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
‘आयसीसी’च्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शहा हेसुद्धा उपस्थित होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र भारतातील करोनाजन्य स्थिती पाहता हा विश्वचषक संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येण्याची शक्यता आहे.
‘‘विश्वचषकाच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी ‘आयसीसी’ने ‘बीसीसीआय’ला २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. पुढील बैठकीत ‘बीसीसीआय’ परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन सर्वाच्या दृष्टीने अंतिम निर्णय घेईल, असे अपेक्षित आहे,’’ असे ‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
विश्वचषकापूर्वी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर यादरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या १४व्या हंगामातील उर्वरित साामने अमिरातीत खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे विश्वचषक तेथेच खेळवणे सोयीचे ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. तसेच ओमान येथे किमान साखळी सामने खेळवण्याच्या पर्यायाचाही ‘आयसीसी’ विचार करत आहे.
‘‘ऑक्टोबरमध्ये विश्वचषकाचे आयोजन करणे शक्य नसल्यास पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा जूनमध्ये भारतात ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय आहे. मात्र फेब्रुवारीत महिला विश्वचषक आहे, तर जूनमध्ये ‘आयपीएल’संपल्यावर भारतात पावसामुळे काही सामन्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, ’’ असेही ‘आयसीसी’चा पदाधिकारी म्हणाला.