कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी टास्कफोर्स व विभागाने समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोनापासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी टास्कफोर्स व विभागाने समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री

मुंबई  : कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील डॉक्टरांचा आणि महिला बालविकास विभागातील अधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणावा, यामध्ये बालकांना कोरोनापासून कशापद्धतीने सुरक्षित करता येईल याचे मार्गदर्शन करावे तसेच बालकांसंदर्भातील विभागाचा अनुभव आणि माहितीची देवाणघेवाण होऊन करावयाच्या उपाययोजनांचा मार्गदर्शक सुचनांमध्ये समावेश करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. मुख्यमंत्र्यांनी महिला बाल विकास विभागाच्या विविध योजना, निधी, कार्यपद्धती याचा सविस्तर आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस महिला बालविकास मंत्री श्रीमती यशोमती ठाकूर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महिला बालविकास विभागाच्या सचिव आय..कुंदन, आयुक्त महिला बालविकास श्रीमती पावनित कौर, आयुक्त एकात्मिक बालविकास श्रीमती इंद्रा मालो, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी आदी मान्यवर उपस्थित होते

          महिला बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सध्याच्या प्रस्तावित योजना, त्यांचा अंदाजित खर्च, अधिकच्या निधीची आवश्यकता याची एकत्रित माहिती आपल्याला देण्यात यावी जेणेकरून विभागाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काय करता येऊ शकेल याचा धोरणात्मक निर्णय घेता येईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक मृत्यू पावले किंवा एक पालक मृत्यू पावला अशा बालकांबाबत विभागाने धोरण निश्चित करावे यामध्ये मुलांच्या संगोपनापासून शिक्षणापर्यंतचे लाभ त्यांना कसे देता येतील याची माहिती देण्यात यावीमाझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून कुटुंबांचे सर्वेक्षण झालेले आहे. या सर्वेक्षणाची संपूर्ण माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. त्यात बालकांची माहिती ही समाविष्ट आहे. यामधील कमी वजनाच्या बालकांकडे अधिक लक्ष देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.