देश सामर्थ्याने विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
नवी दिल्ली, : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत मोदी सरकारच्या 7 व्या वर्षपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले विचार व्यक्त केले. मे महिन्याच्या मन कि बात कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " 30 मे रोजी 'मन की बात' करताना योगायोगाने आजच सरकारला 7 वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षांमध्ये देशाने 'सबका साथ, सबका-विकास, सबका-विश्वास' या मंत्राचा अवलंब केला आहे. देशसेवेसाठी प्रत्येकाने प्रत्येक क्षण समर्पण भावनेने काम केले आहे. बर्याच सहका-यांनी मला पत्रे पाठवून सांगितले आहे की 'मन की बात' मध्ये मी आपल्या या 7 वर्षाच्या एकत्र प्रवासाबाबत देखील चर्चा केली पाहिजे.
या 7 वर्षात जे काही साध्य झाले आहे ते देशाचे आहे, देशवासियांचे आहे. आम्ही या वर्षांमध्ये राष्ट्रीय अभिमानाचे अनेक क्षण अनुभवले आहेत. आता भारतावर इतर देशांचा वैचारिक दबाव नाही, भारत आता स्वतःच्या संकल्पाने मार्गक्रमण करत आहे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप अभिमान वाटतो. भारत आता आपल्याविरूद्ध कट रचणाऱ्याना सडेतोड उत्तर देत आहे हे बघताना आपला आत्मविश्वास वाढतो. जेव्हा भारत राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांशी तडजोड करीत नाही, जेव्हा आपल्या सैन्यांची ताकद वाढते, तेव्हा आम्हाला वाटते की होय, आम्ही योग्य मार्गावर आहोत.
मला आठवते की आदिवासी भागातील काही लोकांनी मला हा पत्र पाठवून सांगितले होते की रस्ता तयार झाल्यानंतर प्रथमच त्यांना उर्वरित जगाचा भाग असल्याचे वाटत आहे. त्याच प्रकारे, कोणी बँक खाते उघडण्याचा आनंद सामायिक करतो, तर कोणी वेगवेगळ्या योजनांच्या मदतीने नवीन रोजगार सुरु करण्याच्या आनंदात मला सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. 'प्रधानमंत्री आवास योजना' अंतर्गत घर मिळाल्यानंतर गृहप्रवेश कार्यक्रमात सहभागी होण्याची अशी अनेक आमंत्रणे सतत मला आमच्या देशवासियांकडून येत आहेत. या 7 वर्षात मी तुमच्या सर्वांच्या अशा करोडो आनंदांमध्ये सहभागी झालो आहे. या 7 वर्षात भारताने 'डिजिटल व्यवहार' मध्ये जगाला एक नवीन दिशा प्रदान केली आहे. आज आपण कोणत्याही ठिकाणी अगदी सहजपणे डिजिटल पेमेंट करतो, या कोरोनाच्या काळातही हे फार उपयुक्त ठरत आहे. आज देशवासी स्वच्छतेप्रती अधिक जागरूक आणि दक्ष होत आहेत. आम्ही मोठ्या प्रमाणात उपग्रह देखील प्रक्षेपित करत आहोत आणि विक्रमी स्तरावर रस्ते देखील बनवत आहोत. या 7 वर्षात देशातील अनेक जुने वादही संपूर्ण शांतता व सामंजस्याने मिटविण्यात आले आहेत. ईशान्य ते काश्मीर पर्यंत शांतता व विकासाचा नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
तुम्ही विचार केला आहे का की अनेक दशकांपासून ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्या सर्व गोष्टी या 7 वर्षात कशा झाल्या? हे सर्व शक्य झाले कारण या 7 वर्षात आम्ही सरकार आणि लोकांहून अधिक एक देश म्हणून काम केले, एक टीम म्हणून काम केले, 'टीम इंडिया' म्हणून काम केले. प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी काही पावले उचलण्याचा प्रयत्न केला आहे. होय! जिथे यश असते तिथे परीक्षा देखील असतात.
या 7 वर्षात आम्ही एकत्रित बर्याच कठीण परीक्षा दिल्या आहेत आणि प्रत्येक वेळी त्यातून यशस्वीरीत्या बाहेर आलो आहोत. कोरोना साथीच्या स्वरूपात, इतकी मोठी परीक्षा तर सुरूच आहे. हे एक असे संकट आहे ज्याने संपूर्ण जगाला त्रास दिला आहे, अनेक लोकांनी आपले प्रियजन गमावले आहेत. मोठमोठे देशदेखील त्याच्या तडाख्यातून वाचलेले नाहीत. या जागतिक साथीच्या काळात भारत 'सेवा आणि सहकार्याचा' संकल्प घेऊन मार्गक्रमण करत आहे. "