जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?; अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?; अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वी धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. एटीएसने कारवाई करत दोघांना अटक केली होती. त्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने सोमवारी बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली. या अटकेनंतर खळबळ उडाली असून, भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

धर्मांतरांच्या घटना वाढल्याचा दावा करत योगी सरकारने उत्तर प्रदेशात धर्मांतर विरोधी कायदा लागू केला. या कायद्याखाली कारवाया केल्या जात असतानाच उत्तर प्रदेश एटीएसने अवैधपणे धर्मांतर करणाऱ्या दोघांना अटक केली. देशभरात केल्या जात असलेल्या धर्मांतर रॅकेटचा हे दोघे भाग असल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केला होता. मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. त्यानंतर एटीएसने सोमवारी आणखी तिघांना अटक केली आहे.

या वृत्ता हवाला देत भाजपाचे नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ट्विट करत भातखळकर यांनी ठाकरे यांना सवालही केला आहे. “उत्तर प्रदेशातील धर्मांतराच्या षडयंत्रात सहभागी असल्याच्या आरोपावरून उत्तर प्रदेश पोलिसांनी बीडच्या एका युवकाला अटक केली आहे. त्याचे लागेबांधे निश्चितच महाराष्ट्रात खोलवर पसरलेले असणार. ठाकरे सरकारने ही पाळेमुळे खणून काढावीत. जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?,” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.