रत्नागिरी : कोकणातील विजेच्या तारांना जालन्यातील खांबांचा आधार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रत्नागिरी : कोकणातील विजेच्या तारांना जालन्यातील खांबांचा आधार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात तौते चक्रीवादळामुळे निर्माण झालेला वीजपुरवठा सुरळित करण्यासाठी
राज्याच्या इतर भागातूनही साहित्य आणले जात आहे. जालना येथून खांब आणि ट्रान्स्फार्मर रत्नागिरीत दाखल
झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात तौते चक्रीवादळामुळे महावितरण कंपनीला मोठा फटका बसला. साहित्याची मोठ्या प्रमाणात
मोडतोड झाली. ती यंत्रणा पुन्हा एकदा उभी करण्यासाठी महावितरण कंपनीला सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरू
झाला आहे. वादळाने जिल्ह्यातील चिपळूण, खेड आणि रत्नागिरी विभागात एक हजार २३९ गावांमधील
वीजपुरवठा बंद पडला होता. गेल्या चार दिवसांत कंपनीचे कर्मचारी, कंत्राटी कामगार आणि स्थानिक ग्रामस्थांनी
अथक परिश्रम करून लोकप्रतिनिधींच्या पाठबळावर एक हजार २१६ गावांतील वीजपुरवठा सुरळित केला आहे.
त्याकरिता लागणारे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि अन्य साहित्याची कोणतीही कमतरता पडणार नाही, याची दक्षता
कंपनीकडून घेण्यात येत आहे. आजच जालना आणि अन्य ठिकाणांहून खांब तसेच इतर अन्य साहित्य
रत्नागिरीत दाखल झाले आहे. आवश्यक त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जाणार आहे.
दरम्यान, जिल्ह्याच्या आणखी काही भागातील वीजपुरवठा सुरू करण्यात महावितरण कंपनीला यश आले आहे.
त्याचा काल, २१ मे रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा तपशील असा – एकूण बाधित एक हजार २३९ गावांपैकी एक
हजार २१६ गावांचा वीजपुरवठा सुरू. २३ गावांचा बाकी. बंद पडलेली सर्व ५५ उपकेंद्रे सुरू. एकूण बाधित ७५४८
ट्रान्सफॉर्मरपैकी ७३७५ सुरू. १७३ दुरुस्त व्हायचे आहेत. एकूण ५,५४,९२१ वीजजोडण्यांपैकी ५,४८,१६७ सुरू. ६७५४

सुरू होणे बाकी. हाय टेन्शन ४८९ बाधित खांबांपैकी २८१ पुन्हा उभे. २०८ उभे राहायचे आहेत. लो टेन्शन १३१६
खांबांपैकी ४३३ उभे राहिले. ८८३ शिल्लक. मनुष्यबळ – कंपनीच्या ७१ पथकांमधील ९१० माणसे. कंत्राटी ३३
पथकांमधील ३०४ माणसे.
महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, श्री. शिवतारे आणि
कैलास लवेकर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित असून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.