भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पार्ट्यांत जसे ईडी, आयटीत दिसते तसे ते कश्मीर खोऱ्यातही दिसावे, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पार्ट्यांत जसे ईडी, आयटीत दिसते तसे ते कश्मीर खोऱ्यातही दिसावे, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

मुंबई : क्रूझवरील ड्रग्स पार्टीवरुन सध्या राजकारण सुरू आहे. हा सर्व भाजपचा डाव असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितले जात आहेत. आता शिवसेनेच्या मुखपत्रातून देखील या विषयावरुन भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. यासोबतच काश्मीर खोऱ्यात मागील पाच दिवसांत दहशतवाद्यांनी सात नागरिकांची हत्या केली आहे. यावरुन देखील शिवसेनेने भाजपवर टीकेचे बाण सोडले आहेत.

'मुंबईतील ‘एनसीबी’च्या धाडसत्रात भाजपाचे कार्यकर्ते सामील झाल्याचे समोर आले. ईडी, सीबीआय, आयटीसारख्या यंत्रणाही भाजपाबरहुकूम चालत आहेत. या तपास यंत्रणांचा ताबा जणू भाजपाने घेतला आहे. सध्या भाजपा सर्वत्रच दिसतोय. फक्त कश्मीर खोऱ्यात निरपराध्यांच्या हत्या सुरू असताना केंद्र सरकार, भाजपाचे अस्तित्व दिसत नाही.' असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

सामना अग्रलेखात नेमके काय?

भाजपा कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पार्ट्यांत जसे ईडी, आयटीत दिसते तसे ते कश्मीर खोऱ्यातही दिसावे. भाजपाचे लोक नशेखोरांना अमली पदार्थांच्या साठय़ासह पकडून देतात, ईडीला कारवाया पुढे रेटण्यात मदत करतात. एवढेच नव्हे, तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘शांत’ करण्यासाठी ‘खासगी आर्मी’ उभारावी असे जाहीर सल्लेही त्या पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना देतात. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीच मध्यंतरी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘जशास तसा’ धडा शिकविण्यासाठी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्हय़ात ‘दंडा फोर्स’ म्हणजे खासगी आर्मी उभारावी, असे म्हटले होते. तुमचा हा ‘दंडा फोर्स’ देशातल्या गरीब आणि न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात वापरण्यापेक्षा कश्मीरातील दहशतवाद्यांविरोधात वापरा. कश्मीर खोऱ्यात सध्या दहशतवाद्यांकडून निरपराध पंडित आणि शिखांच्या हत्या केल्या जात आहेत. तेव्हा या धडपड्या कार्यकर्त्यांनी छातीचा कोट करून कश्मीरातही जावे. त्यांची वाहव्वाच होईल.

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, प्रवक्ते आणि भक्त सर्वत्रच आहेत. फक्त ते कश्मीर खोऱ्यात दिसत नाहीत. कश्मीर खोऱ्यात गेल्या चार दिवसांत भयंकर असा रक्तपात घडला आहे. सात नागरिकांना अतिरेक्यांनी दिवसाढवळय़ा ठार केले. दहशतवादी गावात घुसतात, ओळखपत्रे तपासून हिंदू किंवा शिखांना ठार करतात असे हत्यासत्रच सध्या कश्मीरमध्ये सुरू आहे. श्रीनगरला शाळेच्या महिला प्राचार्यांना अतिरेक्यांनी ठार केले. या प्राचार्या कश्मिरी शीख समाजाच्या होत्या. दीपक चांद नावाच्या शिक्षकास गोळय़ा घालून मारले. ते कश्मिरी पंडित होते. फक्त कश्मिरी पंडित, हिंदू, शीखच नाहीत, तर पोलीस खात्यात कर्तव्य बजावणाऱ्या मुस्लिम अधिकाऱ्यांनाही अतिरेक्यांकडून लक्ष्य केले जात आहे.