पुढील चार-पाच दिवस मुसळधार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पुढील चार-पाच दिवस मुसळधार

राज्यात सध्या पावसाचा लपाछपीचा खेळ सुरूच आहे. कधी उन्हाळ्यासारखं कडक उन तर कधी तुफान पाऊस. कुठे अगदी कमी पाऊस तर कुठे पूरपरिस्थिती. पावसाने काही दिवस विश्रांती घेतली असतानाच आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कालपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पश्चिम राजस्थान, संलग्न गुजरातच्या काही भागातून कालपासून सुरुवात झाली.

मात्र, आता परतीचा पाऊस चार ते पाच दिवस रेंगाळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात 10 ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याच्या पुढच्या 4 ते 5 दिवसात आंध्रप्रदेश किनारपट्टी भागात येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे परतीचा पाऊसही रेंगाळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या आठवड्यातच शेतीची कामं उरकून घ्यावीत असा सल्ला देण्यात आला आहे.

 

यंदाच्या वर्षी मान्सूनचं आगमन काही काळ उशिराने झालं असलं तरी राज्यासह देशभरात समाधानकारक पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती. त्यामुळे मोठं नुकसानही झालं. यंदाच्या पावसामुळे राज्यात पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध आहे. आता या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

गुजरातच्या काही भागातून, पूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश,मध्यप्रदेशच्या काही भागातून मान्सूनच्या परतीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे.