कोकणासह मध्य-पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोकणासह मध्य-पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. यामध्ये कोकणासह मध्य-पश्चिम महाराष्ट्रात जोरदार, तर विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत असून, हे क्षेत्र तीव्र होऊन पश्चिम-उत्तर दिशेने सरकणार आहे. त्याचप्रमाणे सध्या ईशान्य अरबी समुद्रापासून गुजरातपर्यंतच्या किनारपट्टीपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण विभागात पाऊस कायम राहणार असून ११, १२ सप्टेंबरपासून काही भागांत त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे १३, १४ सप्टेंबरला किनारपट्टीलगतच्या भागात सोसाट्याचा वारा वाहणार आहे. मध्य महाराष्ट्रातही १२ सप्टेंबरपासून अनेक ठिकाणी पाऊस होणार असून, पश्चिम-मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होणार असून, विदर्भात १३, १४ सप्टेंबरला काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात सर्वच ठिकाणी १४ सप्टेंबरपर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यांत १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढेल. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत शनिवार, रविवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मुंबई, रत्नागिरीत कमी-अधिक प्रमाणात पाऊस असेल. १३ सप्टेंबरला रायगड आणि १४ सप्टेंबरला पालघर जिल्ह्यांत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत १३ सप्टेंबरपासून घाट विभागांत पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भातील भंडारा, गडचिरोली, गोंदिया आदी जिल्ह्यांत १३, १४ सप्टेंबरला काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.