मी माझं पदक उशाशी घेऊन झोपलो – नीरज चोप्रा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मी माझं पदक उशाशी घेऊन झोपलो – नीरज चोप्रा

शनिवारी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाची उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रा राष्ट्रीय नायक बनला. २३ वर्षीय खेळाडू अॅथलेटिक्स प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय आणि देशातील दुसरा वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता ठरला. या कामगिरीनंतर जागतिक स्तरावर नीरजचे कौतुक होत आहे. स्वीडनहून टोक्योला पोहोचल्यानंतर नीरज चोप्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वेळेच्या फरकामुळे त्याला पहिले दोन दिवस झोपणे कठीण झाले. पण शनिवारी रात्री त्याला अशी कोणतीही अडचण जाणवली, त्याने झोपताना आपले सुवर्णपदक उशाशी ठेवले.

एका मुलाखतीत नीरज म्हणाला, “मी माझे पदक उशाशी घेऊन झोपलो. मी खूप आनंदी होतो पण खूप थकलो होतो, म्हणून मी चांगला झोपलो.ऑलिम्पिक दरम्यान ट्रॅक अँड फील्ड स्टेडियमवर भारताचे राष्ट्रगीत वाजवण्याची ही पहिलीच वेळ होती. याबाबत नीरज म्हणाला, “ही एक वेगळीच भावना होती, आमचे राष्ट्रगीत ऑलिम्पिक स्टेडियमवर वाजत होते. मी त्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. टोक्योमध्ये आल्यानंतर मला नीट झोप लागली नाही. आम्ही स्वीडनहून आलो आणि वेळेत मोठा फरक पडला. पहिल्या काही दिवसांत मला झोपणे खूप अवघड वाटले. पण हरकत नाही, आता माझ्याकडे पदक आहे.

तब्बल १२१ वर्षांची प्रतीक्षा संपली

भालाफेकपटू नीरज चोप्रा हा ट्रॅक अँड फील्ड इव्हेंट प्रकारात ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. ब्रिटिश भारताकडून खेळलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती. परंतु ते इंग्रज होते, भारतीय नव्हते. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. नीरजने भालफेक स्पर्धेच्या अंतिम फेरी पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरले.