उत्तर प्रदेश : प्रियंका गांधींना अटक
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लखनऊ : उत्तरप्रदेशातील लखीमपूर-खीरी येथील आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय. यात 4 आंदोलक आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान मध्यरात्रीनंतर उत्तरप्रदेशला जाणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना हरगावमध्ये अटक करण्यात आली. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खीरी येथे कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू होते. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य़ लखीमपुर खीरीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र टेनी त्यांच्या बनवीरपुर या गावी जात होते. त्यांनाच रिसीव्ह करण्यासाठी अजय मिश्रांचा मुलगा आशिष मिश्रा घरातून बाहेर पडले होते. याचदरम्यान आशिष मिश्रा आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका गाडीला आंदोलनकांनी अडवले. या आंदोलनांना टाळण्यासाठी आशिष मिश्रा यांच्या गाडीचा वेग वाढवण्यात आला. यादरम्यान काही आंदोलक त्यांच्या गाडीच्या समोर येऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी सांगितलं की, या घटनेत ठार झालेले 4 जण हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी आरोप केला की, काही लोकांनी वाहनांवर दगडफेक केली आणि 4 लोकांना मारहाण केली. मिश्रा यांनी दावा केला, की घटनेच्या वेळी त्यांचा मुलगा घटनास्थळी नव्हता. याचे व्हिडिओ स्वरुपातील पुरावे त्यांच्याकडे आहेत. या घटनेच 8 लोकांचा मृत्यू झाल्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी रात्री उशिरा लखनऊमध्ये मुख्य सचिन आणि डीजीपी यांच्यासोबत उच्चस्तरिय बैठक घेतली. त्यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले की, दोषींचा पर्दाफाश केला जाईल. यूपी सरकारने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की ते या घटनेच्या कारणांच्या तळाशी जाईल. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने सांगितले. दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी मध्यरात्रीनंतर उत्तरप्रदेशला जात असताना पोलिसांनी हरगाव येथे त्यांना अटक केलीय.