राज्यात शुक्रवारी विक्रमी लसीकरण
For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी सुरू असून आतापर्यंत दीड कोटी नागरिकांना लशीच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. ही संख्या देशात सर्वाधिक असून राज्याने शुक्रवारी लसीकरणाची विक्रमी कामगिरी नोंदवीत दिवसभरात सुमारे १० लाख नागरिकांचे लसीकरण केले.
दिवसाला १० लाखांपेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते, हे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या लसीकरणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी घेतलेले परिश्रम निश्चितच प्रशंसनीय आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस दिली होती, मात्र हा विक्रम मोडून काढत राज्याने २१ ऑगस्ट रोजी ११ लाख ४ हजार ४६४ नागरिकांचे लसीकरण करून विक्रमी कामगिरी नोंदवली होती. त्यानंतर शुक्रवारी ९ लाख ९० हजार इतक्या मोठ्या संख्येने लसीकरण झाले आहे.